हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,
स. न. वि. वि.
लिहिण्यास कारण कि , गुजरातची प्रगती बघून माझा झालेला जळफळाट व तुम्हास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बदली घेण्यासाठी विनंती.
आज गेले सहा महिने मी गुजरातमध्ये कामा निमित्य राहत आहे. इथले सर्व हमरस्ते हे सुंदर रीतीने बांधलेले व एकही खड्डा नसलेला पाहून मला इथल्या कंत्राटदारांवर कीव आली. तुम्ही इथे इतके काम केले तरी इथे तुमचे कौतुक करणारे चेले नाहीत किंवा खंदे कार्यकर्ते नाहीत हे मला इथे कुठेही 'दात विचकावून हसतानाचे' ,'नमस्कार करतानाचे' , किंवा 'टाटा करत चालातानाचे' वगैरे बोर्ड नाहीत ह्या वरून दिसून आले आणि खूप वाईट वाटले.
तुम्ही इथे फक्त कारखानदारी चा विकास न करता कृषी आणि पर्यटनाचा सुद्धा विकास केला, भरपूर समाजकल्याणाचे काम केलेत, मग तुम्ही स्वतः काय कमावले? तुमचे स्वतःचे एक तरी कॉलेज किंवा टाऊनशिप आहे का ? ......... आमच्या महाराष्ट्रात या आम्ही तुम्हाला सर्व शिकवू.
तुम्ही जर माझ्या विनंतीला मान्यता देऊन आला नाहीत तर मी इथे गुजरात मध्येच राहिला येईन व येताना बिहारी पण घेऊन येईन. मग बघा तुम्हाला पण  'ती' वाली पाणीपुरी खायला लागेल !
आपला.
(नम्र) विशुभाऊ

शनिवार, २८ मे, २०११

.....आला तरी मी घेणार नाही !!


बाबा , हे कमळकर बघा काय बोलत आहेत ते !” बाळ घामा घूम होऊन ओरडत बाबांकडे आला,
बावळटा, शांत हो मी पण बातम्या बघतो !!” बाबा वैतागून बाळावर डावलले . . .
पण राजा आला तर माझे काय होईल ???” तोंडाचा चंबूकरून बाळाने बाबांना प्रश्न केला
अरे तो कशाला झक मारायला येतो आहे , त्याचे झकास चालू आहे, मला वाटते मीच चुकलो !” बाबांनी कपाळाला हात मारला.
आणि त्याने जर टिव्ही वाल्यांसमोर 'यायचे तर या मी नाही जाणार' म्हटले तर कसली विकेट पडेन ना तुमची !” बाळ बाबांना आगंठ्याने टुकटूक करत बोलला. .
खरच बावळट आहेस, आत पाठव त्या मिडीया वाल्यांना!!!!” बाबा गरजले . . .

---- १० मिनीटा नंतर बाबा मिडीया वाल्यान समोर -----
ह्ह्या तो कशाला येतो आहे ??? आणि आला तरी मी घेणार नाही !! “

आपला,
(खट्याळ) विशुभाऊ

गुरुवार, २६ मे, २०११

मराठी बाबा डॉट कॉम

मटा online वाल्यानी चालवलेली चावटगीरी सगळ्यांना ठाऊक आहेच पण काल सागर ने "महिला काँन्स्टेबलवर अत्याचार" ह्या बातमी कडेलक्ष वेधल्यावर खरच तळ पायची आग मस्तकात गेली . . .  अरे हरामखोरांनो तुम्ही आत्याचारावर लक्षवेधणार का अत्याचार करणार??? ही बातमी दाखवताना कॉन्स्टेबल च्या पार्श्वभाग दाखवला आहे . . .

धिक्कार आहे त्या एडिटरचा !!!!

आपला,
(संतापलेला) विशुभाऊ

सोमवार, २३ मे, २०११

बाबरी

साहेब : हॅलो सुनबाई का ?
सुनबाई : (घाबरत) हां हां बोला साहेब
साहेब : नशीब ओळखले . . .  मला वाटले आता ते पण नाही जमणार कि काय
सुनबाई: (थोड्याश्या वैतागून) बोला ना काय काम आहे ?
साहेब : हो तुझ्या तब्येतीची विचारणा करायला फोन नाही केला . . .  जाब विचारायला फोन केला आहे . .  मी ऐकले कि तू बाबरी बनवते आहेस???
सुनबाई: (थोड्या दचकून) हो हो तुम्हाला कोणी सांगितले
साहेब : आमचे गुप्तहेर खाते आजून शाबूत आहे . .  तुझ्या किटली सारखे नाही . .  तू समजतेस काय ग ??
सुनबाई: साहेब असे हात घाई वर नका येऊत, तुमच्या साठीच बनवते आहे . . 
साहेब : माझी इतकी काळजी असती तर अशी नसती वागलीस !!!
सुनबाई: आहो खऱ्या बाबरी मध्ये तुम्हाला कव्हर करणार नाहीच आहे . .  पण तुम्हाला आक्षेप आणि तमाशा करून लोकांचे लक्ष्य फिरवायला चान्स मिळेल आणि मला प्रमोशन साठी. . .
साहेब: तशी हुशार आहेस !!
सुनबाई: तुमच्या कडूनच शिकली , आता तुम्ही फोन केलातच आहे म्हणून सांगते . .  सगळ्याला मला आजून १०० खोक्याची गरज आहे (ओठ दाबून)
साहेब : !!!!!!!!#$%^&!!!!!!

आपला,
(खट्याळ) विशुभाऊ

बुधवार, १८ मे, २०११

गोळीबार...

इकब्या : सलाम भाई
भाई : वालेकुम इकब्या
इकब्या : काय भाई , मला सांगितलेत कि लादेन पण पाकिस्तान मध्ये सुरक्षित नाही , तर आपण काय ?? आणि मला इथे मुंबई ला पाठवले .... काल माझ्यावर हल्ला झाला !!!...
भाई : बाळा, तो हल्ला छोट्या ने नाही केला ... आपणच करवला ...
इकब्या : काय ????
भाई : अरे ... तुमको पता है ना.... मी आपल्या पोरांना फोन नाही करू शकत... मी अंडरग्राउंड आहे .... म्हणून तुझ्यावर म्हणजे तुझ्या त्या रक्षकावर हमाला केला ... म्हणजे आपल्या छोकरे लोगोंको पता चलेगा ... भाई चा भाई आहे मुंबई मध्ये ...
इकब्या : सही है भाई .... कल जो पाकिस्तान मी बंब फुटां... वो आपना सलाम था आपको .... खुदा हाफिस .....

आपला,
(खबरी) विशुभाऊ 

मंगळवार, १७ मे, २०११

एकच प्याला

बियर ची बाटली फेकून देताना मला नेहमीच दुःख होतं, म्हणून एक आयडियाची कल्पना डोक्यात आली आहे . ... इथे जोडलेले चित्र काय ते तुम्हाला सांगून जाईल...




आपला,
(कलाकारी) विशुभाऊ  

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

जैतापूर अणुउर्जा प्रकल्प: विवाद आणि अडचणी

मी माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये जैतापूर च्या आंदोलकांनी घेतलेल्या पावित्र्याचा निषेध केला असला तरी प्रकल्पाच्या विरोधातच माझी मते आहेत. आता प्रकल्पाला विरोध का हे बऱ्याच जणांना माहित नाही आणि कित्येक ह्या लढ्यात उतरणाऱ्या राजकारण्यांना सुध्दा ते माहित नाही; म्हणून मी इथे विवादाची करणे थोडक्यात सांगत आहे... नक्की विचार करा :
१) कुठला ही आण्विक अपघात झाल्यास , दोषी विरुद्ध कायद्याने न्यायालयात जाण्याची परवानगी फक्त NPCL ला आहे अपघात ग्रस्त्याला नाही, असा अनुच्छेद Nuclear Damage Bill २०१० मध्ये आहे.
२) ह्या प्रकल्पा मुळे होणारा वातावरणा वरचा परिणाम ह्या बद्दल आण्विक-विरुद्ध संघटना अजून साशंक आहेत.
३) जैतापूर हे भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील नसले तरी संवेदनशील आहे ( संवेदानाशिलातेच्या दृष्टीने झोन ३ मध्ये आहे )
४) जैतापूर येथील परमाणु कचऱ्याची विलेवाट ह्या विषयावर आजूनही स्पष्टीकरण आलेले नाही किंवा तोडगा सुचवला गेलेला नाही.
५) प्रकल्पा मध्ये समुद्राचे पाणी शीतलक म्हणून वापरून ते पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तिथल्या मास्यांवर आणि मासेमारी धंद्यावर पडणाऱ्या परिणामाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

आपला,
(विचारी) विशुभाऊ

जैतापूर आणि गोळीबार

जैतापूर मध्ये झालेल्या प्रकरणाचा काल मी खुप विचार केला , त्याच्या बर्याच चित्रफिती पहिल्या..... खरे तर जैतापूर प्रकल्पाच्या विरोधातच माझी भूमिका होती आणि आहे, तरी कालचा प्रकार जो आंदोलकांनी केला त्याचा मी नक्कीच निषेध करेन. आंदोलनाचा आणि पोलीस स्टेशन जाळण्याचा काय संबंध???
मला तर असे वाटते की काल जे जाळपोळ करायला गेले त्यांचा आणि आंदोलनाचा काहीच संबंध नाही, त्यांना पोलीस स्टेशन जाळून रेकॉर्ड्स नष्ट करायचे होते आणि त्यात जर पोलिसांनी गोळीबार केला तर काय चुकले ???
मित्रानो कोणत्याही चांगल्या आंदोलनाला साहाय्य करणे चांगलेच पण त्याचा फायदा घेऊन वाईट किंवा स्वार्थी कृत्य करणे हे तितकेच निन्दनीय आहे. जर आज आपण गोळीबारात मारल्या गेलेल्याला श्रद्धांजली देण्याचा विचार करत असाल , तर एकदा नक्कीच सारासार विचार करा.
आपला,
(आंदोलक) विशुभाऊ

सोमवार, १८ एप्रिल, २०११

मराठी ब्लॉगर्स मेळावा २०११


माझ्या ब्लॉगर्स मित्र मैत्रीणींनो ,

ह्या वर्षी चा मराठी ब्लॉगर्स मेळावा दादर , मुंबई येथे सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत करण्याचे योजलेले आहे. मेळाव्याची वेळ , स्थळ ह्याच बरोबर रुपरेषा ह्या सर्वांचा विचार करता फक्त ७५ सदस्यांनाच येथे नोंदणी करण्याचे बंधन नाईलाजाने घालावे लागले आहे त्या बद्दल क्षमस्व !
नोंदणी साठी http://marathibloggersmeet.blogspot.com/2011/04/mbm-mumbai-2011-registration.html येथे टिचकी मारावी

आपले,
(आयोजक)
विशुभाऊ रणदिवे
कांचन करई
महेंद्र कुलकर्णी
सुहास झेले

शुक्रवार, ४ मार्च, २०११

मै शायर तो नही. . . .

ज्या प्रमाणे जे फक्त स्वतः साठी गातात त्यांना 'बाथरूम सिंगर' म्हणतात , त्याच प्रमाणे स्वतः साठी कविता लिहिणाऱ्यां साठी पण एखादा शब्द पाहिजे. मी स्वतः साठी कविता करतो (खरं तर यमक जुळवतो). तरी शायरी आणि गझल हे माझे खास आवडीचे विषय.
इयत्ता चौथीत असताना मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि मार्झा गालिब माझे सोबती झाले. मला उर्दू तर येत नव्हती पण आर्थ समजून उगाच त्याचे मराठीत भाषांतर/भावांतर करत 'तिला' ऐकवत आलो. गेल्या काही दिवसान पासून मी उर्दू जरा मनावर घेऊन अभ्यास चालू केला, व एक गझल सर्दुष्य काव्य केलं ( ह्यात रदीफ आहे पण काफिया जुळला नाही) , पहिलाच प्रयत्न म्हणून मातला आणि मकता मध्ये संपवले.

काफिया है पर रदिफ नही , मतला है पर मकता नही ।
अरे कमिनो ये मेरी जिंदगी है , कोई गज़ल नही ।

नही रोक सकती तुझे कोई सऱहदे , ना कोई इनसान की सलाखे ।
'आझाद' तेरी खुदा से बंदगी है, कोई काफिरोंका बंदी नही ।

इथे काफिर म्हणजे 'माणुसकी नसणारा' ह्या अर्थाने आहे , व 'आझाद' हे माझे तखल्लुस .....

आपला,
(आझाद) विशुभाऊ

रविवार, ९ जानेवारी, २०११

पूर्व दिशा

भारत वर्षाला हजारो हजारो वर्षांचा इतिहास आहे. हजारो वर्षान पासून इथे धार्मिक कार्य, वास्तुशास्त्र हे दिशा प्रमाण मानून होतात, आणि ह्याच गोष्टीनी मला लहान पणा पासून संभ्रमात टाकणारा प्रश्न निर्माण केला ' आधी लोहचुंबक कि आधी दिशा? '.....


ह्या विषयाचा शोध घेताना बरीच पुस्तकं वाचली बर्याच विद्वानांचे निष्कर्ष वाचले आणि एकदा लहानपणी डॉ. प. वि. वर्तक यांचे 'वास्तव रामायण' वाचण्यात आले आणि शोधाला दिशा मिळाली. गेल्या आठवड्यात माझे त्यावेळी केलेले संशोधन आणि हस्तलिखिते मिळाले आणि पुन्हा त्या विषयाला उजाळा आला; तर चला बघूया आपले पूर्वज दिशा कसे ओळखत असत ......

रामायणात प्रत्येक दिशेचे सुंदर वर्णन सुग्रीव ह्याने आपल्या वानर सेनेला सिताशोधार्थ पाठवताना केले आहे. किष्किंधा सर्ग ४० मध्ये सुग्रीव खालील प्रमाणे पूर्व दिशेचे वर्णन वानर सेनेचा सेनापती विनात याला करतो:


त्रिशिराः कांचनः केतुः तालः तस्य महात्मनः ।
स्थापितः पर्वतस्य अग्रे विराजति स वेदिकः ॥४-४०-५३॥


अर्थ: तीन शिरा असलेल्या सोनेरी तालवृक्षाकृती त्याचे महत्म असून, ते पर्वताच्या अग्रभागावर स्थापित आहे.

पूर्वस्याम् दिशि निर्माणम् कृतम् तत् त्रिदशेश्वरैः ।
ततः परम् हेममयः श्रीमान् उदय पर्वतः ॥४-४०-५४॥
तस्य कोटिः दिवम् स्पृष्ट्वा शत योजनम् आयता ।
जातरूपमयी दिव्या विराजति स वेदिका ॥४-४०-५५॥


अर्थ: त्रीदशेश्वाराने पूर्व दिशेला ह्याचे (तालवृक्षाचे) निर्माण केले, त्याच्या मागे सोनेरी (हेममयः) उदय पर्वत आहे. त्याचे कोटी दिव्य स्पृष्ट हे शंभर योजने उंचीचे आहे, व जो सोनेरी दिव्य विराजित करतो.

इथे सुग्रीवाने पूर्व दिशेची ओळख म्हणून उदय पर्वतावर कोरलेल्या एका सोनेरी तालवृक्षाची खुण सांगितली आहे, आणी ही खुण दुसरे तिसरे काही नसून पेरू देशातला मधला 'Trident' आहे, व त्याचेच हे तंतोतंत वर्णन आहे. त्या पूर्वेच्याखुणेला कसे पोहचायचे ह्याचे वर्णन सुद्धा सर्ग ४० मध्येच आहे.





नदीम् भागीरथीम् रम्याम् सरयूम् कौशिकीम् तथा || ४-४०-२० ||
कालिंदीम् यमुनाम् रम्याम् यामुनम् च महागिरिम् |
सरस्वतीम् च सिंधुम् च शोणम् मणि निभ उदकम् ||४-४०-२१ ||
महीम् कालमहीम् चैव शैल कानन शोभिताम् |
ब्रह्ममालान् विदेहान् च मालवान् काशि कोसलान् ||४-४०-२२ ||
मागधाम् च महाग्रामान् पुण्ड्रान् अंगाम् तथैव च |
भूमिम् च कोशकाराणाम् भूमिम् च रजत आकराम् ||४-४०-२३ ||


अर्थ: (सुग्रीव विनत ला सांगतो) भागीरथी नदी ( बघ) ,रम्य शरयू नदी ,कौशिक नदी बघ. कालीन्दिम पर्वतातून वाहणारी नदी यमुना बघ तिचा उगम रम्य महागीरीत आहे. सरस्वती नदी पण बघ सिंधू नदी पण बघ आणी शोणाम नदी बघ ज्याचे पाणी मोत्या सारखे आहे. महिम नदी बघ कालमहिम बघ जे जंगलाने शोभित आहे, ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान (सारखी राज्ये) सुध्दा बघ. मागध सारखे महाग्राम बघ , पुण्ड्रान , अंगाम सुद्धा तिथेच आहेत. कोषकाराची ( कोषातून रेशीम उत्पन्न करणार्यांची) भूमी बघ , रजताची (चांदीची) भूमी बघ.



पूर्वेला कसे जायचे हे सांगताना सुग्रीव विंध्य पर्वताच्या उत्तरेस म्हणजे दक्षिण भारताच्या उत्तरेस आणी यमुना नदीच्या पूर्वेस असणाऱ्या सर्व प्रदेश सांगतो. ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान, मागध , अंगाम इत्यादी राज्ये सांगितल्यावर तो रेशीम उत्पन्न करणारे आणी चांदीची खाणी असणारे प्रदेश बघायला सांगतो. ह्या सर्वाचे वर्णन ऐकल्या वर हा प्रदेश म्हणजे आजचा ब्रम्हदेश वाटतो.

त्यापुढे त्याने जे वर्णन केले आहे, ते सयाम, चीन आणि जपान सारखे असून पढे प्रशांत महासागरातून दक्षिण अमेरिकेचे वाटते.

सध्या आपण प्रशांत महासागरातील काल्पनिक रेषा जी पूर्व मानतो, त्या पेक्षा हजारो वर्षान पूर्वी आपल्या पूर्वजांनी प्रशांत महासागरा पलीकडील पर्वत ही पूर्व मानून त्यावर 'तालवृक्ष' म्हणजे 'Trident' कोरला...



आपला,

(दिशाशोधी) विशुभाऊ

रविवार, २ जानेवारी, २०११

झिरो डायल

गेले ५ महिने वाचन आणि लिखाणाच्या बाबतीत माझे फार उदासीन गेले . पण मागील आठवड्यात थोडा व्यापातून मोकळा झालो आणि "Zero Dial" हे 'जे. डे' यांनी लिहीलेले व  'जयको पब्लीकेशन' यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचायची संधी मिळाली.
हे पुस्तक, पोलिसांचे खबरी (informers) आणि त्यांचे आयुष्य व त्यातिल संकटं ह्यांचा आढावा घेणारे सत्य घटणेवर आधारीत नव्हे सत्यघटणाच सांगणारे व एका पत्रकाराच्या द्रुष्टीने प्रकाश टाकणारे आहे.
तिन खबरी आणि पोलिस ह्यांनी केलेली कामे आणि त्यातिल फसवे व किळसवाणे राजकारण . . .  दाऊद- छोटा राजन ह्यांच्या टोळी युध्दात खबरींनी केलेली कामे. . . एक फार घाणेरडं जग जे ड्रग्ज, गुह्णे आणि कुंठणखाना ह्यांनी भरलेलं आणि त्यात शोधत जगणारा आशावाद. . .  भरतातील कुख्यात अतंकवादी रियाज़ भटकळ ह्याचा पाठलाग व खबरीं, पोलिस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी केलेली मेहनत. . . ह्या सगळ्या मुद्यांचा मेळ ह्या पुस्तकात फार सुंदर प्रकारे घातला आहे .
डे हे मुंबई मधले एक प्रसिध्द पत्रकार आहेत व त्यांच्या प्रतिभावंत लिखाणामुळे वाचनाची मजा काही ऒरच होती. . . .


आपला,
(वाचक) विशुभाऊ..

शनिवार, ३१ जुलै, २०१०

फलक

राजकारणामध्ये स्त्रीयांना १००% आरक्षण मिळावे ह्या विचार धारणेचा मी आहे, ह्याचे कारण म्हणजे रस्त्यावर लागणारे वाढदिवसाचे फलक; ह्या फलकां मधले चेहरे बघून मन उबगले आहे.
आज काल फ्लेक्स चे फलक कोणी ही बनवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.... ज्याला रोजच्या जिवनात रस्त्यावरचं काळं कुत्रही विचारत नाही तो कार्यसम्राट, ह्रुदयसम्राट वगैरे बनतो...... काही असेच फलक बघून मन उबगलेले होते आणि ह्याचाच विचार करत मला झोप लागली.... सकाळी झोपेतून उठून बघतो तर काय , माझ्या घरा समोर मोठा फलक लागलेला होता आणि त्यावर लिहीलेले होते...

थोरविचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार विशुभाऊ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


शुभेच्छूक,


नाना , तात्या, बाळ्या, गोट्या आणि समस्त परिवार ....

.
.
.
.
आपला,

(प्रबोधनकार) विशुभाऊ .....

सोमवार, २६ जुलै, २०१०

संशोधन (ई.स. २९९९)

मराठी ह्या भाषेबद्दल इतिहासात भरपूर वाद होते असे संशोधनाअंती लक्षात येते. मराठी भाषा आणि मराठी भाषीक लोकं ह्यांच्या भवतालचे बरेच प्रवाद लिखीत स्वरूपात उपलब्द्ध आहेत.

मराठी ही जमात त्यावेळची सगळ्यात छळलीगेलेली किंवा सगळ्यात छळीक जमात होती (दोन विरोधाभासी प्रतिमा) व ह्या दोन्ही प्रतिमेबाद्दल अजुनही इतिहासात वाद आहेत. मराठी भाषेची सुरवात ही विसाव्या शतकातकाच्या उत्तरार्धात झाली असून ठाकरे आडणावाच्या कुटूंबाने ती केली असावी असे केलेल्या संशोधनाअंती वाटते.

त्यावेळच्या मराठी लोकांची आजूबाजूच्या सगळ्याच प्रदेशांशी भांडणे होती. तात्कालीन उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या गरीब प्रदेशातील लोकांवर त्यांनी मारहाण केली होती ,आंध्रप्रदेशातील लोकांचे पाणि अडवले होते, आणि कर्नाटक राज्यातील काही प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या घटणांना तेव्हा राजकारण म्हटले जात असे; ठाकरे घराण्यातील एका प्रसिध्द व्यक्तीचे नाव ’राज’ होते, व ह्या वरून ’राज’कारण हा शब्द तयार झाला असावा.
सुरवातीच्या काळात मराठी ही ईंग्रजी अक्षरं वापरून लिहीली जात असे, व तेव्हा ईंग्रजी अक्षरं ABCD ने चालू होत असत. त्या नंतर एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनिकोड चा शोध लागल्यानंतर मराठी भाषेला आपली लिपी मिळाली, व त्या नंतर ईंग्रजी अक्षरांची QWERTY ने सुरवात होऊ लागली.

आपला,

(संशोधक) विशुभाऊ

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

वर्ल्डकप !!

शेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....

राजा : कोण आहे रे तिथे ????

प्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे??

राजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते!!!

प्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती !

राजा : म्हणजे??? तुम्हाला सुध्दा वाटते, दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळू शकत नाही ????

प्रधान : साहेब, असे कसे होईल ???? मला एक सांगा , आज काल तुम्ही कोणाला गोट्या / विटी दांडू म्हणजे आपले लहान पणी चे खेळ खेळताना पाहीले आहे का?

राजा : नाही ...

प्रधान : अहो, आज कालची मुले क्रिकेट पण नाही खेळत !!!

राजा : मग करतात काय ही कार्टी ??????

प्रधान : साहेब, आपला देश हा कृषी प्रधान आहे ... ’फार्मविले’ खेळतात !!!

राजा : क्या बात है !

प्रधान : म्हणून आपण एक नवीन वर्ड्कप चालू करू ’फार्मविले वर्ड्कप’.... २०११ मध्ये हा वर्ड्कप पहीला आपल्या गावातच होईल !!!

राजा : ( एक टाळी आणि उडी मारून) प्रधानजी माझा रथ काढा !!!

आपला,
(प्रधान) विशुभाऊ ..

सोमवार, ७ जून, २०१०

कट्टा

कॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असलो, तरी कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...

आज बऱ्याच वर्षांनंतर कट्ट्यावर जायचे ठरवले... जाताना बऱ्याच कल्पना रंगवल्या होत्या.... वाटले होते जुने सोयरे भेटतील, मजा मस्ती होईल... रंग्याचे जोक, भिक्या च्या थापा, बापट्याच्या कविता ऐकायला मिळतील..नविन जोमाचे नविन जवान आपला कट्टा रंगवत असतील... पक्या नेहमी प्रमाणे ऊधारी ची आठवण करून बिडी हातात टेकवत असेल..... मी खुप एक्सायटेड होतो... चालता चालता आतंर संपतच नव्हते, शेवटी तर धावत सुटलो, जवळ जवळ पाच एक वर्षांचे अंतर जे कापत होतो मी.... आणि जेव्हा पोहचलो तेव्हा मला जोराचा धक्काच बसला....

पक्या बिचारा कुठेतरी शुन्यात नजर लावून पानाला कथ्था लावत होता (कोणाच्या ठाऊक नाही).... कट्टा रिकामा होता, रंग्या-भिक्या तर नाहीच पण नविन पोरं सुध्दा नाहीत... पक्याला विचारले तर त्याने काही न बोलता हात पालथे करून दाखवले.... मी पण थोडे सावरण्या साठी सिगारेट सुलगवली आणि जुन्या आठवणीन मध्ये उभा राहीलो... तेवढ्यात कॉलेज ची काही मुलं माझ्या समोर ऊभी राहिली व अभ्यासा बद्दल बोलू लागली, मी दुर्लक्ष करणारच तितक्यात मला जाणवले की ही पोरं फ़ेसबुक आणि ट्विटर वर रात्री कट्टा जमवण्याच्या प्लॅन करत होते....

मला त्या पोरांची खुप किव आली ............. सिगरेट न पिणारी, तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती, आपला कट्टा काळाआड गायब करणार; हे बघून माझे  ह्रदय तिळ तिळ तुटले.....

आपला,
(कट्यावरचा) विशुभाऊ

रविवार, ६ जून, २०१०

प्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १

आमच्या ईंजिनिअरींग कॉलेज मधल्या प्राध्यापकांचे इंग्रजी म्हणजे नक्कीच एक संशोधनाचा विषय. खाली दिलेली जी उदाहरणे आहेत ती मी नविमुंबई मधल्या एका डिप्लोमा कॉलेज ला होतो तेव्हाची....

१) आमच्या वेळी डिप्लोमा्ला वार्षिक अभ्यासक्रम होता, माझे पहिलेच वर्ष... फिजीक्स (भौतीकशास्त्र) ह्या विषयाला आम्हाला पहिले सहा महिने कोणी शिक्षकच नव्हते. नंतर जे आले ते एकदम सहा फूट १०० किलो चे आजोबा. त्यांनी येताच आमचे प्रॅक्टिकल्स चालू केली.... आम्ही सगळे लॅब च्या बाहेर, रांगेत उभे होतो आणि सरोबा समोर टेबल वर बसलेले होते... ते तिथुनच ओरडले "रोल नंबर वन टू फ़िफटी हॅव एन्ट्री आदर हॅव डिसेंट्री" .... मी रणदिवे रोल नंबर ९० म्हणजे मला "डिसेंट्री".....

२) गणिताचा तास म्हाणजे हक्काचा मस्ती करायचा तास, त्या वेळी आमचे पुजारी सर फक्त फळ्या कडे बघून शिकवायचे, मागे वळून सुध्दा बघायचे नाहीत... पण त्या ऐतिहासीक दिवशी मी मस्तीत जाम सुटलो होतो आणि आमच्या सरांचा सुध्दा तोल सुटला, ते जोरात माझ्या वर ओरडले " रणदिवे स्टॅंडप" , मी चुपचाप स्टॅंडलो, व पुढिल आदेशाची वाट पहात होतो... पाच मिनीटे गेली सर माझ्या तोंडाकडेच बघत उभे, काही बोलेनाच.. अजुन पाच मिनीटांनी ते मला म्हणाले " फॉलो मी" ... मी चुपचाप त्यांना फॉलो करत दरवाजाच्या बाहेर गेलो व ते मला म्हणाले " नाऊ डोंट फॉलो मी".................

३) आमचे वैद्य सर म्हणजे त्यांच्या विषयातले गाढे-पंडीत, पण इंग्रजी हा त्यांचा नक्कीच विषय नव्हता... मला एकदा मेकॅनिक्स च्या प्रॅक्टिकल ला जायला उशीर झाला, वैद्यसर माझ्यावर भडकले व त्यांनी मला खडसावून विचारले
सर : " व्हाय लेट??"
मी : " ???????"
सर : " आय एम आस्किंग यू , व्हाय लेट??"
मी : " सर माय सायकल गॉट पंक्ट्चर, सो...."
सर ( समोर च्या मैदाना कडे बोट दाखवत): " नाउ रोटेट द ग्राउंड फ़ोर टाईम्स..."

मी आपला ग्राऊंड चार वेळा रोटेट करून परत सरां-समोर उभा राहीलो, सरांना कदाचीत माझी दया आली असावी ते मला म्हणाले " नाउ गो ऍंड अन्डरस्टॅंड द ट्री!!"

आपला,
(भयंकर इंग्रजी) विशुभाऊ

बुधवार, १२ मे, २०१०

टुगेदर

माणूस आणि  त्याचे मन , हा वर्षानु वर्षे  सुटलेला गुंता  तेच  मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे.  ह्याच मनाचा एक  भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकताझिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदरम्हणजे हाच विषय.
ह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणीत्यांचे हळुवार संबंध  त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहेहे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा  स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहेविनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभवहे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.
मी पाहिलेले 'टुगेदरनाटक हे प्रायोगिक नाटक होतेपण हे नक्कीच 'व्हाईट लिलीकिंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.

आपला,
(नाटकी) विशुभाऊ

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

नवी पिढी

"तू मोठा होऊन कोण बनणार?"
"ST BUS Driver!!" .....

लहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो ! खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...

पण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... "हिप हॉप डान्सर होणार !" .... "बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे !!! त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....

दोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की !!!

आपला,

(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....