हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, ३१ मे, २००९

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय भाग-2

आम्हाला आलेल सुन्दर पत्र, ईथे प्रकाशित करत आहोत !
आपला, (नम्र) विशुभाऊ ___________________________________


- अमेय गोगटे

महेश मांजरेकरांचा ' मी शिवाजीराजे... ' आपण सगळ्यांनी पाहिला आहेच. त्यातली शिवाजी महाराजांची एन्ट्री आठवा... ' लाज वाटते मराठी म्हणून जन्माला आल्याची,  हे दिनकरराव भोसलेंचे हताश, हतबल उद्गार ऐकून व्यथित झालेले छत्रपती शिवाजी महाराज, आपले मावळे पाठवून दिनकररावांना रायगडावर बोलावून घेतात आणि त्यांची चांगलीच कानउघाडणी करतात.

आता ' पार्ट II' मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर महाराज त्याहूनही अधिक व्यथित झालेत आणि चिडलेतही. (का ?, ते आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे.) तर, यावेळी त्यांनी आपले दोन मावळे ' मातोश्री ' वर आणि दोन ' कृष्णकुंज ' वर (किंवा कृष्णभुवन) पाठवले आणि ते उद्धवसाहेब आणि राजसाहेबांना रायगडावर घेऊन गेले.

कट टू रायगड...

(महाराजांचा दरबार भरलेला. राज आणि उद्धव झोपेतून जागे होतात. एकमेकांकडे पाहतात आणि लगेचच तोंड फिरवतात. पुढच्याच क्षणाला समोर साक्षात छत्रपतींना पाहून दोघंही थक्क होतात. बाळासाहेब आणि बाबासाहेबांनी (पुरंदरे) शिकवल्याप्रमाणे दोघंही लवून महाराजांना मुजरा करतात.)

उद्धव-राज एकत्रः महाराज आपण ?
महाराजः होय...मी !
राजः महाराज, आपण स्वतः येण्याची तसदी घेतलीत ?
महाराजः न येऊन कसं चालणार होतं ?
उद्धवः का महाराज ? आमचं काही चुकलं का ?
महाराजः चुकलं ? अहो, घोडचूक झालेय तुमच्याकडून. भाऊबंदकीचा शाप आपल्या महाराष्ट्राला नवा नाही. मात्र, तुमच्या भाऊबंदकीचा त्रास माझ्या मराठी बांधवांना, माता-भगिनींना भोगावा लागतोय. म्हणूनच तुम्हा दोघांना इथे बोलावून घेतलंय आम्ही...
राजः नेमकं काय झालंय महाराज ?
महाराजः काय झालंय ? दो ही मारा, पर सॉल्लिड मारा, हे तुमचे उद्गार ऐकलेत आम्ही ! अहो, पण ते दोन रट्टे माझ्या मराठी माणसालाच लागलेत ना !
(राजला झापल्याचं पाहून उद्धव गालातल्या गालात हसतात. तेव्हाच महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे जातं.)
महाराजः उद्धवसाहेब तुमचीही प्रतिक्रिया वाचली आहे आम्ही. मराठीचं काय करायचं ते मनसेला विचारा, असं सांगून तुम्ही मोकळे झालात. तुमचं दोघांचं जे काही चाललंय, ते कितपत योग्य आहे ?
राजः महाराज, आमच्यात काय झालंय ते बहुतेक तुम्हाला ठाऊक नाही.
महाराजः आम्हाला ठाऊक नाही ? गनिमी कावा काय असतो हे आम्ही तुम्हाला शिकवलं. त्यावेळचे आमचे गुप्तहेर आजही तितकेच समर्थ आहेत. महाराष्ट्रात जे काही होतंय, ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचतंय. विशेषतः, शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर तर आमचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तुमच्यात काय झालं, कसं झालं, हे सगळं आम्ही जाणतो. अगदी २७ नोव्हेंबर २००६ पासून, किंबहुना त्या आधीपासूनचा सारा घटनाक्रम आम्हाला ठाऊक आहे. मराठी माणसाला हक्काचे दोन नेते मिळतील, असं आम्हाला त्यावेळी वाटलं होतं. पण हे सगळं भलतंच घडतंय.
उद्धवः महाराज, पण लोकसभा निवडणुकीत जे काही झालं, तो तमाशा ' राजा ' मुळेच झालाय ना ? त्याची जी काही ' बकबक ' चाललेय, त्यामुळेच मराठीच्या दुश्मनांचं भलं होतंय. त्यामुळे त्यानं सुधारायला हवं.
राजः महाराज, तुम्हीच सांगा कोण चुकतंय ? मराठी माणसाचा आवाज उठवण्याचा मी प्रयत्न केलाय. आमच्या ' दादू ' ला मराठीचा एवढाच पुळका आलाय, तर त्यांचे ११ खासदार काय नेपाळी आहेत का ?
महाराजः (अधिकच संतापतात) ... खबरदार ! ही सगळी भाषणात ऐकवायची वाक्यं आम्हाला ऐकवू नका. ती आधीच ऐकली आहेत आम्ही आणि त्यामुळेच व्यथित झालो. खरं तर आधीच बोलावून, तुम्हाला खडसावण्याचा विचार होता. पण म्हटलं, तुम्ही सुजाण आहात, हुशार आहात, सगळं ठीक होईल. पण कसलं काय, तुम्ही तर माझ्या मराठी माणसांमध्ये फूट पाडताय. हे आम्ही सहन नाही करू शकत.
राजः (अत्यंत खेदाने) असं नका म्हणू महाराज, बरं का !
महाराजः तुम्हीच भाग पाडलंय मला हे सगळं ऐकवायला. अतिरेक झालाय सगळा. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टानं उभ्या केलेल्या शिवसेनेची, मराठी माणसाच्या संघटनेची काळजी वाटतेय आता आम्हाला. काय वाटत असेल त्यांना हे सगळं पाहून ? लोकसभा निवडणुकीत मराठी माणसामुळे, मराठी माणसाचं पानिपत झालं आणि तरीही तुमचं वाक्-युद्ध सुरूच आहे, ही बाब आमच्या मनाला चटका लावून गेली आहे. याचसाठी का केला होता अट्टाहास ? याचसाठी का मराठा तितुका मेळविला होता ?

(दरबार शांत. राज-उद्धव अंतर्मुख होऊन विचार करत असतात. महाराज दोघांकडेही पाहतात.)

उद्धवः महाराज, तुमच्या मते हा दोष कुणाचा ?
महाराजः चूक तुम्हा दोघांचीही आहे.
राज-उद्धव एकत्रः ती कशी
महाराजः आठवून पाहा शिवचरित्र. सगळ्या मराठींना-मराठ्यांना-माझ्या या सगळ्या मावळ्यांना एकत्र घेऊन आम्ही लढलो नसतो, तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं असतं का ? शाहीर बाबासाहेब पुरंदरे आमचे चरित्र सांगताना हे प्रत्येक वेळी सांगतात. तुम्ही दोघंही ते बालपणापासून ऐकत आहात. कळतंय सगळं पण वळत नाही आहे.
राजः असं का म्हणता महाराज ?
महाराजः अहो , शिवाजी काय म्हणतो हे तुम्ही तुमच्या भाषणांतून कायम सांगत असता . पण ते कृतीत उतरलं नाही . पहिले ते राजकारण , हे तुम्ही लक्षात ठेवलेत , पण त्यातलं सावधपण तुम्ही विसरलात . पांडव आणि कौरव एरव्ही एकमेकांच्या विरोधात होते . पण तिसरा शत्रू आला की ते १०५ होते . पण तुम्ही एकमेकांविरोधात लढत राहिलात आणि त्यात ' शत्रूं ' चा फायदा झाला . आता मला मुंबई - ठाण्यातल्या माझ्या मराठीजनांची काळजी वाटतेय . त्यांचं रक्षण तुम्हालाच करावं लागेल .
उद्धव-राज एकत्रः ते कसं शक्य आहे महाराज ?
महाराजः का शक्य नाही ? मराठी माणसाचा उद्धार करण्याचं, महाराष्ट्राचं भलं करण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे ना...मग का नाही शक्य ? लोकसभा निवडणुकीतले मतांचे आकडे बघा. मतांचं विभाजन झालं नसतं, तर विजय मराठी माणसाचाच होता. विधानसभा निवडणुकीत तशी रणनीती आखा. हवं तर आमची प्रत्येक लढाई आठवून पाहा आणि त्यातून काहीतरी बोध घ्या. एकत्र आलात, तर उत्तमच...पण वेगळं राहूनही मराठी माणसांसाठी एक होऊ शकता ना ! तसं झालं तर आणि तरच मराठी माणसाला न्याय मिळेल, त्याचा दबलेला ' आवाज ' पुन्हा फुटेल. हा आमचा सल्ला नाही, तर आदेश आहे आणि तुम्हाला आदेश करण्याचा आम्हाला हक्क आहे. आहे ना ?
राजः महाराज , हे काय विचारणं झालं का ?
महाराजः तर मग शपथ घ्या, मराठी माणसासाठी एकदिलानं लढण्याची. शत्रूचा सामना करण्यासाठी तुम्हाला तलवार द्यायची गरज नाही, कारण तुमचे शब्दच तितके धारदार आहेत. त्याचा योग्य वापर करून मराठीच्या शत्रूंना नामोहरम करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत !
उद्धव-राजः आम्ही चुकलो महाराज ! आता आम्ही एकदिलानं लढण्याचा प्रयत्न करू.

(या प्रसंगाचा हा शेवट समस्त मराठीजनांची इच्छा लक्षात घेऊन केलाय. काय मंडळी, तुम्हालाही तसंच वाटतंय ना ? )
 
आपला विनम्र
विकास रणदिवे

 

शनिवार, १६ मे, २००९

होय मी मराठीच !!

आज लोकसभेच्या निकाला ने सिद्ध केले की आम्ही भावकीच्या भांडणात सर्व दुसर्याच्या खिश्यात टाकू पण भावाला काही देणार नाही................

सेनेला ना मनसेला, महाराष्ट्र काँग्रेसला !!!!!!!!!!!!

आपला,
(मराठी) विशुभाऊ

गुरुवार, १४ मे, २००९

महाराष्ट्र भारता बाहेर !!!!

आज india.gov.in ह्या संकेत स्थळावर, प्रत्येक राज्यस्थरावरील Ruls & Regulation बघत होतो , आणि माला मोठा धक्का बसला !!!!!!!!! त्या राज्यातील यादी मध्ये महाराष्ट्र सोडून बाकि सगळे राज्य आहेत !!!!

आपला ,
(गोंधळलेला मराठी ) विशुभाऊ !