हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

तुंबाड

तुंबाड हा फक्त एक सिनेमा नसून, स्वतःला त्यात गुंतवणारा एक अनुभव आहे. पुस्तकातील भयकथा वाचताना जसे चित्र डोळ्या समोर उभे राहते अगदी तसेच इफेक्ट देऊन सिनेमा उभा केला आहे. प्रत्येक प्रसंगातील एक एक डिटेलिंग एवढे सुंदर आहे कि, पुस्तक वाचताना आपण जसे रिडींग बिटवीन द लाईन्स करतो अगदी तसे घडते.
मुळात तुंबाड हि रवी बर्व्यानी लिहिलेल्या कथेवर लवक्राफ्ट ह्यांच्या 'हस्तर' ह्या काल्पनिक दैवाची, स्टीवन किंगची 'ग्रॅम्मा' आणि त्याचे भावांतर असलेली नारायण धारपांची 'आजी' आणि ऋषिकेश गुप्तेनी पुढे जाऊन त्यावर आधारित लिहिलेल्या 'गानू आजी' ह्या सर्वांचे संस्कार आहेत. एवढे संस्कार घेऊन कथा लिहिताना आणि दिग्दर्शित करताना त्याला नक्कीच न्याय मिळाला आहे असे मला वाटते. नारायण धारपांचा आणि त्यांच्या लिखाणाचा मी चाहता असल्याने मला वाटते कि त्यांच्या 'आजी' आणि 'बळी' ह्या दोन कथांची एकत्र सांगड घालून तयार झालेली कलाकृती म्हणजे 'तुंबाड'.
तुंबाड च्या कथेला धारपांच्या कथेचे स्फुरण आहे हे स्वतः रवी बर्व्यानी मान्य केले असले तरी हा सिनेमा एक मास्टर पीस आहे. दिग्दर्शन आणि ऍनिमेशन ह्याची एक सुंदर सांगड घातलेली आहे असे म्हणायला हरकत नाही, फक्त पुण्याचे काही रटाळ सिन सोडता.

पुढील लिखाण हे सिनेमा न बघितलेल्यानी वाचू नये (!! स्पॉईलर अलर्ट !!)

सिनेमा मध्ये मी केलेलं रिडींग बिटवीन द लाईन्स :
१) 'विनायक' आणि 'सदाशिव' हे वाड्यात राहण्याऱ्या म्हाताऱ्या 'सरकार' ची अनैतिक मुलं असून त्यांच्या घरात राहणारी म्हातारी ही त्या म्हाताऱ्या सरकारची आई आणि त्या मुलांची आजी आहे.
२) म्हातारीला 'हस्तर' झपाटल्याने, देवीच्या गर्भातील सोने काढण्याची पद्धत त्या म्हाताऱ्या सरकारला कळली नाही आणि त्या मुळे त्याला खजिना कधीच मिळाला नाही.
३) म्हातारीला जीवनातून मुक्त करण्याच्या अटीवर विनायकला पध्द्त समजली, आणि म्हातारीला चपळतेने विहिरीत उतरता येत असल्याने तिला तिचा नवरा मेल्यावर सुद्धा सती जाऊन दिले नव्हते.
४) मुळात गर्भात दाखवलेला 'हस्तर' हा लोभाचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अति लोभाने जास्त प्रमाणात आणलेल्या पिठाच्या बाहुल्यांनी जास्त 'हस्तर' प्रतिमा तयार केल्या.

तेव्हा तुम्हाला ह्या सिनेमा बद्दल काय वाटले ते नक्की कळवा !

आपला,
(भयकथा प्रेमी) विशुभाऊ  

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

अंता माते

फट्याकSSS  !
मी सणसणीत कानफटात लगावली आणि बोललो "माझी थट्टा करतोस? अंतरात्मा असे नाव असते का?"
"अरे अंता माते असे नाव आहे माझे , अंता माझे नाव आणि माते शेवटचे नाव !"
इयत्ता आठवीत माझ्या वर्गात आलेल्या नवीन वर्गमित्राला नाव विचारताना घडलेली ही गोष्ट. शेवटचे नाव म्हणजे आडनाव कि अजून काही ते कळले नाही, पण माझ्या ऐकण्यातील चुकी मुळे मी समोरच्याला एक लगावल्याने फार खजील झालो.
"माफ कर मित्रा चूक झाली !"
त्याने हात जोडले आणि म्हणाला "माफी मागणारा देवा पेक्षा थोर असतो.... त्यात तू मला मित्र म्हणालास... तुझा राग कधीच येणार नाही!"
त्याचे तत्वज्ञान ऐकून मी गोंधळून गेलो, माझ्या इतक्या वर्षांच्या मनोवृत्तीला आणि अहंकाराला उभा तडा देणारे होते हे.
गण्या त्यादिवशी शाळेत नसल्याने त्याला मी माझ्या बाकावर बसवून घेतले. तो मन लावून अभ्यासाकडे लक्ष देत होता आणि मी संपूर्ण दिवस धक्क्यातून सावरत नव्हतो.
नंतर कळले की तो ठाण्याच्या कुठल्यातरी आदिवासी पाड्यातला एक आदिवासी आहे. त्यावेळी मला आदिवासी म्हणजे 'झिंगलाला' करणारे धनुष्यबाण वाले असेच वाटत असे. पण हा तसा दिसत नव्हता. रोज चुरगळलेला पण स्वच्छ गणवेश घालून केस विंचरून यायचा. त्याचा 'दादू' म्हणजे मोठा भाऊ त्याला सकाळी रिक्षेने शाळेत सोडायचा आणि नंतर स्वतः दिवसभर रिक्षा चालवायचा.
कालांतराने मी त्याच्याशी एक अंतर ठेवू लागलो. माझा ग्रुप वेगळा, माझे वाचन वेगळे आणि मुळात गप्पा वेगळ्या. पण हा रोज माझ्यासाठी जंगलातील 'मेवा' आणायचा. मेवा म्हणजे बोरांचे, चिंचेचे, तत्सम फळांचे किंवा मधाचे वेगवेगळे प्रकार. माझी खाण्यातील रुची त्याने बरोबर हेरली होती आणि तो ती यथाशक्ती पुरवत होता. मेवा देऊन बदल्यात तो काहीच अपेक्षा धरत नव्हता, ना बोलण्याची ना खेळण्याची ना अभ्यासाची. माझ्याशी मैत्री निभावणे हे देवाने दिलेले कर्तव्य असल्या सारखे निर्मळ मनाने तो पूर्ण करत होता. मी फक्त भोग घेत होतो व तेव्हा मला किंवा माझा मनाला काहीच वाटत नव्हतं.
नंतर इयत्ता ९वी मध्ये त्याला कुठली तरी शिष्यवृत्ती मिळाली आणि तो वसतिगृह असलेल्या कुठल्यातरी शाळेत गेला. जाताना मला सांगून गेला पण मी बेपर्वाईने त्याला 'ठीक' असे बोलून टाटा केला व परत आपल्या दिनक्रमेत रुजू झालो.
ह्या गोष्टीला अंदाजे २२ वर्षे झाली असतील आणि इतक्या मोठ्या कालखंडात तो माझ्या विस्मृतीत गेला.  आज सकाळी ऑफिसला जाताना सिग्नलला माझ्या कारच्या बाजूला कॅम्री उभी होती. मी त्या गाडी कडे पहिले तेव्हा त्या गाडीवाल्याने काच खाली करून माझ्या कडे पहिले व हसला. मला ओळखायला पण फार वेळ नाही गेला तो अंताच होता.
सिग्नल क्रॉस केल्यावर मी गाडी बाजूला घेतली आणि त्याच्या साठी बाहेर आलो. त्याने सुद्धा गाडी बाजूला घेतली आणि काच खाली करून सांगितले "अरे माझी फॅक्टरी पण वागळे इस्टेट मध्येच आहे तुझ्या ऑफिस जवळ, फॉलो मी वी विल टॉल्क देर !"
मी पुन्हा बधिर होऊन बसलो गाडीत 'म्हणजे मी काय करतो आणि कुठे आहे हे त्याला माहित आहे !' .......

"हम बेवफा हो गये पर यार यारी निभाता रहा !!!"

आपला,
(मित्रनिष्ठुर) विशुभाऊ